योगासन

'सलमान खान' किंवा 'जॉन अब्राहम' चा सिनेमा पाहून आलो की दुसऱ्या दिवशी पासून आम्ही व्यायाम सुरू करतो. त्यासाठी आम्ही लगेच  'जीम' मध्ये जाऊन एक वर्षांचे पैसे भरून टाकतो. मग 'ट्रॅक सूट, स्पोर्ट शूज, कॅलरी मोजणारे घड्याळ' असा जामानिमा करून आम्ही आरशासमोर डंबेल्स फिरवायला सुरुवात करतो. या काळात घरात काजू, बदाम असा खुराक असतो. हे वेड तब्बल 'सात ते आठ' दिवस टिकतं. नंतर मग सकाळी उठायला उशीर झाल्यानें त्यात खंड पडतो. सुटलेलं पोट एक 'नॅनो मीटर' ही कमी होत नाही आणि वजन काटा रोज वाढत्या बाजूनेच दिसल्याने आमचा भ्रमनिरास होतो. कोणीतरी आम्हाला सुचवतो 'वॉक' केल्याशिवाय पोट कमी होणार नाही, कोणती म्हणतं 'सायकलिंग' करा, कोणी सांगतं 'रात्री जेऊ नका' तर कोणी म्हणतं 'भरपूर खा, काही होत नाही' . विशेष म्हणजे असे सल्ले देणाऱ्यांची पोटं चांगलीच 'सुटलेली' असतात. महिनाभर लोकांनी सांगितलेलं सर्व काही आम्ही करून बघतो. वजन कमी झाल्यासारखं वाटायला लागतं. तेव्हड्यात एखादा मित्र म्हणतो "बारीक झाल्यासारखा वाटतोस रे तू?" त्याच्या या बोलण्याने पुनः अंगावर 'मूठभर मांस' चढते. बरेच लोक आमच्यासारखेच हताश झालेले दिसतात. काही लोक घरीच 'वॉकर' आणून ठेवतात. पण सकाळी 'वॉकर' आणि संध्याकाळी 'जॉनी वॉकर' यामुळे त्यांच्या वजनात ढिम्म फरक पडत नाही. व्यायामाची आवड आणि सवय लहानणापासून लागली पाहिजे. 'सुर्यनमस्काराची' जागा जेव्हा 'चन्द्रनमस्कार' घेतात तेव्हा वजन वाढायला सुरुवात होते.

     तरुणांना बॉडी बनवण्याची घाई असते.
ते जीम तर जॉईन करतातच सोबत टीव्ही वरच्या जाहिरातींना भुलून विविध व्यायाम साधने ऑनलाईन मागवतात. बाजारातून पहिलवान बनवणारी वेगवेगळी औषधे घेतात.त्यात स्टिरॉइड्स असतात. त्यांनी हाडे ठिसूळ होऊ शकतात. शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. तज्ञांच्या सल्ल्याशिवाय अशी औषधे घेणे घातक असते. जीम मध्येही व्यायाम किती आणि कसा करावा याचं मार्गदर्शन घेणं आवश्यक असते. परवा एक तरुण व्यायाम करतानाच कोसळला आणि प्राणास मुकला. पुनः अशी दुर्घटना कोठेही, कधीही होऊ नये.

     'लुळ्या पांगळ्या श्रीमंती पेक्ष्या धट्टी कट्टी गरिबी बरी' असा सुविचार आम्ही लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. उत्तम आरोग्य असल्याशिवाय आपण जीवनाचा आनंद घेऊच शकत नाही हे खरं आहे. शरीराने किरकोळ दिसणाऱ्या गजानन महाराजांना मारण्यासाठी गावच्या पाटलाच्या मुलांनी जाड जाड उसाच्या कांड्या आणल्या होत्या. महाराजांनी त्याची 'मोळी' करून ती पिळून त्याचा रस काढून दाखवला होता. ही 'योगा'ची कमाल होती. शरीराच्या प्रत्येक स्नायूस मजबूत बनवणे, शरीरास ऑक्सिजनचा योग्य पुरवठा होणे, आंतरिक शक्तीस जागे करणे हे लाभ 'योगा' मुळे होऊ शकतात. 'योगा' हे भारताने जगाला दिलेले एक वरदान आहे. 'योगासने, सूर्यनमस्कार ' या द्वारेच आपण सुदृढ, सशक्त, निरोगी, उत्साही , बलवान बनू शकतो. उत्तम आहार, आदर्श दिनशैली आणि त्यास योगासनांची जोड दिल्यास एक सशक्त, सुसंस्कारित समाज घडू शकतो. 'आयुष्यभर पैशांसाठी आरोग्य खर्ची घातल्यास शेवटी आरोग्यासाठी पैसा खर्ची घालण्याची वेळ येते.' केवळ बलदंड शरीरयष्टी म्हणजेच आरोग्य नाही. शरीर 'पिळदार, निरोगी, लवचिक आणि दीर्घायुषी' बनवायचे असेन तर 'योगा' स पर्याय नाही. या सुंदर जगाचा लवकर *वि'योग'* टाळायचा असेल तर *'योग'* करा.
   
     योग दिनाच्या शुभेच्छा!

©मंगेश पंचाक्षरी, नासिक.
इमेल:- mangeshp11@gmail.com

Comments

Popular posts from this blog

२७ ऑक्टोबर तारीख स्वभाव

३० ऑक्टोबर तारीख स्वभाव

२२ ऑक्टोबर तारीख स्वभाव